जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे आणि शिक्षकांच्या कार्यक्षमतेबाबत गंभीर आढळून आल्यामुळे जिल्हा परिषदेने कठोर निर्णय घेत १० दिवसांत तब्बल ३५ शिक्षकांना निलंबित केले आहे. शिक्षण उपसंचालक गुलाबराव खरत यांनी यासंदर्भातील कार्यवाही करत स्पष्ट केले की, शाळांमधील घटती पटसंख्या, गुणवत्तेतील घसरण आणि जबाबदारीपासून पळ काढणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करणे आवश्यक बनले होते.
ही कारवाई शिक्षण विभागाकडून 'अकार्यक्षम शिक्षक शोध मोहीम' अंतर्गत करण्यात आली असून यात विशेष समित्या नियुक्त करून निरीक्षण व चौकशी केली गेली. निरीक्षणात हे स्पष्ट झाले की अनेक शाळांमध्ये शिक्षक शाळेत उपस्थित राहूनही अध्यापन कार्य करत नाहीत. विद्यार्थ्यांची उपस्थिती खालावली असून इयत्ता ५वी व ८वीच्या मूल्यमापन परीक्षांमध्येही विद्यार्थ्यांचे अत्यंत कमी गुण दिसून आले.
शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ३५ शिक्षकांची सेवा निलंबित करण्यात आली आहे. यामध्ये मलकापुर, शेगाव, चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, मोताळा यांसारख्या ठिकाणांतील शिक्षकांचा समावेश आहे. या शाळांमधील शिक्षकांनी अध्यापनात कसूर केल्याचे निष्पन्न झाले.
कारवाईसाठी नियुक्त केलेल्या समित्यांनी पाहणी करून स्पष्ट केले की काही शाळांमध्ये शिक्षकांनी आपल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडलेल्या नाहीत. विशेष म्हणजे काही शिक्षकांनी वर्गात उपस्थिती नोंदवूनही अध्यापन केलेले नाही. यामुळे गुणवत्तेचा दर्जा ढासळला आणि पालकांनीही आपल्या मुलांना शाळेत पाठवणे टाळले.
शाळा आणि संबंधित पटसंख्या घटलेली ठिकाणे:
सांडस, भांदगड राजूर, हसनाबाद, बेंदूरडी, वडगाव शे., गायकवाड वाडी, माळेगाव खुर्द, हिंगणी, रिधोरा, खडकी आदी शाळा.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा गुलाबराव खरत, यांचे नुसार"विद्यार्थ्यांची गुणवत्ता राखणे व त्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावणे ही शिक्षकांची प्राथमिक जबाबदारी आहे. काही शिक्षक शिक्षणापेक्षा केवळ हजेरी पूर्ततेकडे लक्ष देत होते. अशा शिक्षकांवर कारवाई करणे अपरिहार्य झाले होते."
ही कारवाई बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षण प्रणालीत एक मोठा संदेश देणारी ठरली आहे. गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, हे या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे.
Comments
Post a Comment